मंगरूळ नवघरेत बिबट्याच्या धुमाकूळ! ९ बकऱ्यांच्या गळ्याचे लचके तोडले

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मंगरुळ नवघरे गावाजवळ गोठ्यात २५ ते ३० बकऱ्या बांधलेल्या असतांना १५ जून रोजी अचानक बिबट्या गोठ्यामध्ये घुसला व हल्ला करून २५ ते ३० बकऱ्यांपैकी नऊ बकऱ्यांच्या गळ्याचे लचके तोडून हत्या केली.
बकऱ्यांचे मालक चांदखाँ याशिनखा हे सकाळी गोठ्यामध्ये पिल्ले पाजण्यासाठी गेले असता तेथे त्यांना मरण पावलेल्या बकऱ्या दिसल्या. याबाबत त्यांनी लगेच गावातील पोलीस पाटील पती श्याम धमक यांना बोलावून या घटनेची माहिती दिली. त्यांनी लगेच वनविभाग व महसूल विभाग यांना माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा ठाकरे, वनरक्षक गायकवाड, उबरहंडे व गोवरगुरु महसूल विभागाच्या तलाठी,कोतवाल गजानन अंभोरे, पशुवैद्यकीय डॉ. मोरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जवळपास या मजुरांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांमध्ये बिबट्याच्या या हल्ल्यामुळे भीती निर्माण झाली आहे. तरी वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा यांनी या परिसरामध्ये असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा. जेणेकरून यापुढे होणाऱ्या घटनेला आळा बसेल, अशी मागणी मंगरूळ नवघरे येथील नागरिक करीत आहे.