पेठ जवळच्या अपघातातील आणखी एका महिलेचा मृत्यू! ट्रॅव्हल्स पुलाखाली कोसळली होती! २० जखमी! चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बाबा ट्रॅव्हल्सची बस जळगाव जामोद वरून पुण्याकडे जात होती. पेठ जवळच्या अरुंद पुलावरून ही बस नदीपात्रात कोसळली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अमडापुर आणि चिखली पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे संगीता निवृत्ती ठाकरे(४१, रा. धापटी,ता.खामगाव) या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले, मृतक महिलेच्या पतीसह तिची मुलगी या अपघातात जखमी झाली आहे. दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील लीलाबाई विष्णू भुट्टे (६५) या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अमडापुर पोलिसांनी लक्झरी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण टेकाळे करीत आहेत.
अरुंद पुलामुळे झाला अपघात?
पेठ जवळच्या पैनगंगा नदीवरील पुल हा खूपच अरुंद आहे. एकावेळी दोन मोठी वाहने पुलावरून जात असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. याशिवाय या पुलावर कठडे सुद्धा नाहीत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात पुल कुठपर्यंत हे समजण्यात नवीन वाहनचालकांचा गोंधळ उडतो. रात्री झालेल्या अपघाताचे सुद्धा हेच कारण आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुलाची रुंदी वाढवण्यात यावी, त्याला कठडे बसवण्यात यावे अशी मागणी होत आहे.