"कार्यमग्नता जीवन व्हावे,मृत्यू हीच विश्रांती!" बुलडाण्याचे माजी आमदार बाबुराव पाटील यांचे निधन! मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना;१९८५ च्या निवडणूकीत ३६ हजार २७७ मते मिळवून झाले होते आमदार

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   जिल्हावासीयांसाठी आज, १९ ऑक्टोबरची सकाळ दुःखद बातमी घेऊन उजाडली. गांधीवादी विचारांचे पाईक, बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विठ्ठलराव उर्फ बाबुराव सोनाजी पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. आज, दुपारी २ वाजता  चिखली तालुक्यातील त्यांच्या गावी सावरगाव डुकरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संपूर्ण हयातभर विचारांसाठी, जनतेच्या सेवेसाठी कार्यतप्तर राहणाऱ्या बाबुरावजी पाटील यांच्यासाठी मृत्यू हीच विश्रांती ठरली. बाबुरावजी पाटील यांच्या निधनावर अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबुराव पाटील यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. १९८५ ला बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी १ लाख ३२ हजार ९८४ एकूण मतदान असलेल्या या मतदारसंघात ६४ .६८ टक्के म्हणजेच ८४ हजार ३०८ मतदान झाले होते. त्यापैकी बाबुरावजी पाटील यांनी ३६ हजार २७७ इतके मिळवून विजय मिळवला होता. त्यांनी माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पत्नी सुमनबाई पटेल  यांचा ४ हजार ४२७  मतांनी पराभव केला होता. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुमनबाई पाटील यांना ३१ हजार ८५० मते मिळवली होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला तरी १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट भास्कररावजी शिंगणे यांना मिळाले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. 

१९९५ ला लढवली होती चिखली विधानसभा..!

बाबुरावजी पाटील हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. १९९० ला तिकीट मिळाले नाही तरी त्यांची विचारांवरील, पक्षावरील निष्ठा कमी झाली नाही. १९९५ ला चिखली विधानसभा मतदारसंघात त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत भाजपच्या रेखाताई खेडेकर पहिल्यांदा आमदार झाल्या. बाबुरावजी पाटील यांनी या निवडणुकीत १३ हजार १२३ मते मिळवली होती.
   
मान्यवरांच्या शोकसंवेदना..!

बहुजन समाजातील एक आदर्श जेष्ठ मार्गदर्शक व्यक्तीमत्व सामाजिक परिवर्तनाचे पाठीराखे, आदरणीय मामा उपाख्य बाबुरावजी पाटील माजी आमदार चिखली यांना देवाज्ञा झाली.जुन्या पिढीतील एक आदर्श नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा, प्रचंड अभ्यास आणि प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यावर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन नेहमीच लाभयचे. त्यांच्या अचानक जाण्याने बहुजन समाजाला मोठा धक्का बसला आहे.ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. या कठीण समयी आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. माझ्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.. 
 श्वेताताई महाले , आमदार,चिखली

बाबुराव काका हे अत्यंत प्रामाणिक आणि पक्षासाठी झटणारे निष्ठावान आदर्श व्यक्तिमत्व होते. संपूर्ण हयातभर त्यांनी जनसेवेचे काम केले. साधी राहणी उच्च विचारसरणी असणारे आणि गांधीवादी विचारांचे पाईक, आदर्श राजकारणी बाबुरावजी काका यांच्या दुःखद निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे
    राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस