सुरक्षित राहिली ना सडक, काळ देऊ शकतो धडक! वाहतूक नियमांच्या जनजागृतीचा फार्स
बुलडाणा शहरातील बस स्थानकातून जबरदस्तीने प्रवाशांना बोलावून ऑटो,काळी पिवळी जीपमध्ये प्रवासी वाहतूक होते. बस स्थानकासमोरच कुठेही बेशिस्तित ऑटो उभे राहतात. त्यामुळे एसटी सह येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. जांभरून रोडवर, संगम चौक,जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक,कारंजा चौक, चिखली रोडवरील त्रिशरण चौक येथे वाहतुकीमुळे प्रचंड वर्दळ असते. परंतु येथे ट्राफिक पोलीस सकाळी ११ नंतर दिसून येत नाहीत. रस्त्यांवर वाहनांची सर्कस सुरू असते.
सध्या वाहतूक विभागाकडून जनजागृतीचा केवळ फार्स दिसून येतो. वर्षातून केलेली एक दोन वेळेची जनजागृती परिणामकारक दिसून येत नाही. आरटीओ कडून पासिंग केलेल्या ऑटोमध्ये ३ प्रवासी व ड्रायव्हर असा नियम असला तरी क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ७ ते ८ प्रवासी भरून वाहतूक केली जाते. यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.