बुलडाण्यात भगवी लाट! सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हिंदुराष्ट्रसेनेचे धनंजय देसाई म्हणाले" हिंदूंनी राजसत्तेला बांधील राहू नये, राजसत्ता हिंदूंना बांधील असली पाहिजे;

विश्व हिंदू परिषदेचे अटल पांडे म्हणाले, जात - पात विसरून हिंदू म्हणून एकत्र या! आ. गायकवाड म्हणाले, लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठेचून काढू

 
yuhgb
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा". आम्हाला नवाब मलिक पोसणारी यंत्रणा नकोय. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या थडग्याचे  उद्दात्तीकरण करणारी राजसत्ता आम्हाला नकोय तर ते उदात्तीकरण तोडणारी राजसत्ता आम्हाला हवी आहे. पण हिंदूंनो राजसत्तेला बांधील राहू नका तर राजसत्ता ही हिंदूंना बांधील असली पाहिजे असे प्रतिपादन हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आज, २ जानेवारी रोजी बुलडाणा येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. लव्ह जिहाद करणाऱ्यांना कठोर शासन करावे,  गोहत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व भारताला राजकीय स्थरावर हिंदुराष्ट्र घोषित करण्यात यावे या  मागण्यासाठी सकल हिंदू समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मजागरण प्रमुख अटल पांडे, आ.संजय गायकवाड, बजरंग दलाचे प्रांत संयोजक अमोल अंधारे, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष केशव बेंडवाल, शिवव्याख्याता भाग्यश्री मोहिते, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री माधव धुंदाळे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना धनंजय देसाई म्हणाले की, सद्गुणांची विकृती झाल्यामुळेच हिंदूचा पराभव झाला. "अहिंसा परमो धर्म" हे आम्हाला अर्धवट शिकवल्या गेले, मात्र धर्मासाठी केलेली हिंसा ही अहिंसेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे ते म्हणाले. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे म्हणायला अजित पवारांना लाज कशी वाटत नाही. संभाजी महाराजांच्या धर्मवीर आणि धर्मप्रेमी असण्याबद्दल औरंगजेबाला सुद्धा संशय नव्हता असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. प्रत्येक हिंदूने आपल्या जातीचा अहंकार न जपता हिंदू असल्याचा अभिमान बाळगावा. फांद्यांचा अहंकार न जपता मुळाचा अभिमान बाळगा असे ते म्हणाले. मुलींनो तुमचा विवेक जागा ठेवा, तुझे कौतुक करणारा प्रत्येक मुलगा तुझ्यावर प्रेम करेलच असे नाही तर त्यातील काही आफताब सुद्धा असू शकतात. लव्ह जिहाद हे मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, त्यापासून आपल्या लेकिंना वाचवा. लव्ह जिहाद करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, गोहत्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. सांस्कृतिक दृष्ट्या भारत हिंदू राष्ट्र आहेच मात्र राजकीय स्थरावर भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे अशा आमच्या मागण्या असल्याचे धनंजय देसाई म्हणाले.
   
जात - पात विसरून हिंदू म्हणून एकत्र या: अटल पांडे 

   या देशात हिंदू बहुसंख्य असताना मागण्या मान्य करून घेण्यासाठी हिंदूंना मोर्चा काढण्याची वेळ यावी हीच शोकांतिका आहे. १९४७ ला भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा भारतात ७ टक्के मुस्लिम होते,आता मुस्लिमांची जनसंख्या २५ टक्के झाली आहे. मात्र पाकिस्तानातल्या हिंदूची संख्या घटली, आता तिथे १ टक्का सुद्धा हिंदू शिल्लक राहिले नाही. लोकसंख्येचा वाढता असमतोल हिंदू समाजापुढील मोठे आव्हान आहे. १९४७ लाच सगळे मुसलमान तिकडे पाठवायला पाहिजे होते, हे बाबासाहेब सांगत होते, मात्र तेव्हा बाबासाहेबांचे ऐकल्या गेले नाही. त्याचा परिणाम आता हिंदू समाजाला भोगावा लागत आहे. हिंदू समाजाने जात पात - भेदभाव विसरून एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मजागरण प्रमुख अटल पांडे यांनी केले.
   
  लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठेचा: आ. संजय गायकवाड

  लव्ह जिहाद ही हिंदू समाजाला लागलेली मोठी किड आहे. आतापर्यंत लव्ह जिहादला बळी पडलेल्या २२२ मुली आपण हिंदू धर्मात परत आणल्या. मी नखा पासून तर डोक्याच्या केसापर्यंत हिंदुत्ववादी आहे. बुलडाणा जिल्ह्यात लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठेचल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आ.संजय गायकवाड यांनी केले. सभेपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.