शहरवासीयांनो एक दिवस अन्नदात्यासाठी द्याच : - रविकांत तुपकरांचे भावनिक आवाहन

 
tupkar
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या ताटातला अन्नाचा कण अन कण शेतकऱ्यांच्या घामाने पिकला आहे. प्रत्येक घासाला शेतकऱ्यांच्या श्रमाचा वास आहे. परंतु हाच जगाचा पोशिंदा चोहोबाजुने संकटात आहे. अशावेळी गावगाड्यातील शेतकऱ्याना आधार देणे, त्याला पाठबळ देणे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे एल्गार मोर्चाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या गावगाड्यातील शेतकऱ्यांना साथ द्या, त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्यासोबत मोर्चात सहभागी व्हा, एक दिवस आपल्या अन्नदात्यासाठी द्या, असे भावनिक आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे.

शहरवासीयांना आवाहन करताना रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, दररोज आपण जे अन्न खातो ते शेतकऱ्यांच्या प्रचंड परिश्रमातून निर्माण होते. शेतकऱ्यांनी अन्न पिकवणे बंद केलं तर आपण काय खाणार? अजून तरी टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यांमध्ये अन्न निर्मितीची सोय झालेली नाही, अन्नधान्य निर्मितीचे तंत्रज्ञान विकसितच झालेलं नाही. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही आणि देश सुद्धा टिकू शकत नाही. मात्र हाच बळीराजा आता संकटात आहे. अतिवृष्टीने त्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जे पीक वाचलं त्याला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव राहिलेला नाही. यावर्षी तर सोयाबीन-कापसाचा उत्पादनखर्चही भरून निघणार नाही, अशी अवस्था आहे.

यावर्षी सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च सहा हजार रुपये तर मिळणारा भाव चार हजार आणि कापसाचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च ८५०० रुपये तर बाजारात कापसाला भाव फक्त ६ ते ७ हजार आहे. त्यामुळे शेतकरी आज तोट्यात आला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी घेरला गेला आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आत्महत्येचा आकडा सतत वाढत आहे, ही सर्वांसाठी चिंतेची  बाब आहे. शेतकऱ्यांचा आता सर्वांवरचा विश्वास उडालेला आहे. आज तो बळीराजा एकाकी पडलेला असतांना त्याला तुमच्या साथीची गरज आहे.

अशा वेळी आपण आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याला आधार देण्याची नितांत गरज आहे. त्याला पाठबळ देणे, आधार देणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.  त्यामुळे शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, नोकरदार, व्यापारी, विचारवंत, साहित्यिक, दुकानदार अशाच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी बळीराजाच्या पाठिशी उभे राहण्याची ही वेळ आहे. रविवारी ६ नोव्हेंबर रोजी  बळीराजाची फौज आपल्या घामाचे दाम मागण्यासाठी मोठ्या संख्येने बुलढाण्यात दाखल होत आहे. राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आपल्या बुलढाण्यातून होत आहे. या बळीराजाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी , त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती देण्यासाठी 'एल्गार मोर्चा'त आपण सहभागी व्हा व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आधार द्या. तुम्हा शहरवासीयांच्या आधाराची शेतकऱ्यांना प्रचंड आवश्यकता आहे. तुमची पाठीवरची थाप आणि एल्गार मोर्चातली साथ त्याला जगण्याला उभारी देणार आहे. त्यामुळे रविवारी आपल्या पक्षाचे जाती-धर्माचे सर्व झेंडे बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून एकत्र या आणि आपल्या पोटात जाणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक घासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या 'एल्गार मोर्चा'त सहभागी होऊन बळीराजाला हिम्मत द्या. एक दिवस आपल्या अन्नदात्यासाठी आपण दिला पाहीजे, असे अवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.