BIRTHDAY SPECIAL आजचे राजकारण मेवा मिळविण्यासाठी, सेवाभाव हरवत चाललाय; कृषी मित्र ,काँग्रेस नेते सचिन बोंद्रेनी व्यक्त केली खंत! म्हणाले, आज खऱ्या अर्थाने भारत जोडण्याची गरज!
तोडण्यावर नव्हे तर जोडण्यावर आमचा विश्वास; आयुष्य काँग्रेससाठीच असल्याचेही म्हणाले..
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली म्हणजे बोंद्रे कुटुंबीयांचा गडच. जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून चिखलीकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा कायम लागून असतात. अशा राजकीय भाऊगर्दीत स्वतःच्या कार्यकर्तुत्वाने सचिन बोंद्रे यांनी वेगळेपण जपलय. चिखली नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. शहरी आणि त्यातही सधन कुटुंबात जन्म झालेला असला तरी सचिन बोंद्रेच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेती.. शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नावर ते कायम अग्रेसर असतात. नुकताच बुलडाणा येथे रविकांत तुपकर यांच्य नेतृत्वात सोयाबीन ,कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा पार पडला.या एल्गार मोर्चाच्या जागृतीसाठी सचिन बोंद्रे यांनी अनेक गावांत जाऊन जनजागृती केली..
नेतृत्व अन् दातृत्व...
हल्लीच्या राजकारणात दातृत्व हा कमालीचा दुर्मिळ गुण. सगळं काही मलाच मिळालं पाहिजे अशी मानसिकता अनेक राजकीय नेत्यांची असते.. विना फायद्याचे कोणते काम होत नाही अशी स्थिती..सचिन बोंद्रे यांनी मात्र दातृत्वाचा दुर्मिळ गुण जपलाय. आतापर्यंत हजारो गरीब, दिनदुबळ्या, गरजू लोकांना दवाखान्यासाठी, लग्नकार्यासाठी त्यांनी मदत केलीय..मात्र एवढे करूनही मी केले असे त्यांनी कधी सांगितले नाही. त्यामुळे सचिन बोंद्रे एवढ्या नावानेही अनेकांना आधार मिळतो..
वासनिकांनी साजरा केला वाढदिवस..
काल, ८ नोव्हेंबरला मुकुल वासनिक चिखली येथे होते. मुकुल वासनिक यांच्याशी त्यांचे अगदी घनिष्ट आणि पारिवारिक संबंध. याचा परिचय काल, चिखलीवासियांना आला. काल, वासनिक यांनी केक भरवून सचिन बोंद्रेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
सचिन बोंद्रे म्हणतात...
आज वाढदिवसाच्या दिवशी सचिन बोंद्रे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत नांदेड येथे सहभागी झाले आहेत. दरम्यान बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारचे तोडण्याचे राजकारण सुरू आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी शेकण्याचे काम सुरू असल्याने याविरुद्ध आता आवाज उठवण्याची गरज आहे. आता खऱ्या अर्थाने भारत जोडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. राजकारणातून पैसा मिळवणे, वडिलांनी जेवढे कमावले त्यापेक्षा जास्त कमावले पाहिजे असे जर आजच्या तरुणांना वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे. राजकारण मेवा मिळविण्यासाठी नव्हे तर सेवा करण्याचे साधन म्हणून राजकारणाकडे पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस हा पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा, संविधान मानणारा पक्ष आहे. तोडण्यावर नव्हे तर जोडण्यावर आमचा विश्वास असल्याने काँग्रेसच्या वाढीसाठी झटणार असल्याचे ते म्हणाले.