"पीएम किसान" सन्मान योजनेसाठी "हे" शेतकरी पात्र नाहीत!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने २०१९ साली सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ अद्यापही लाखो कुटुंबांना मिळत आहे. आतापर्यंत या योजनेचे १९ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षभरात ६,००० रुपये थेट लाभ स्वरूपात दिले जातात. मात्र, या योजनेबाबत एक महत्त्वाचा आणि अनेक शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणारा मुद्दा सध्या चर्चेत आहे.

तो म्हणजे — स्वतःच्या नावावर जमीन नसलेल्या, म्हणजेच दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्या भाडेकरू किंवा कंत्राटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो का? याचे उत्तर स्पष्टपणे "नाही"असे आहे.
योजनेच्या अटी स्पष्ट – मालकी हक्क अनिवार्य..
पीएम किसान योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळतो, ज्यांच्या नावावर स्वतःची शेतीची जमीन नोंदणीकृत आहे. केंद्र सरकारने योजनेचे निकष ठरवताना 'मालकी हक्क' या मुद्द्याला विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळे भाडेकरू शेतकरी, कंत्राटी शेती करणारे, किंवा जमीन नसलेले शेतीमजूर यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
अर्ज करताना ‘७/१२ उतारा’ आवश्यक
या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्याच्या नावावर जमीन असल्याचा दस्तऐवज सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये ७/१२ उतारा, मालकी पत्रिका, किंवा खरेदीखत यासारख्या अधिकृत कागदपत्रांची गरज भासते. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच शेतकऱ्याला लाभ मंजूर केला जातो.
अर्ज फेटाळण्याची शक्यता!
जर अर्ज करताना पुरेसे पुरावे सादर करण्यात आले नाहीत, किंवा अर्जदार पात्र ठरत नसेल, तर त्याचा अर्ज फेटाळण्यात येतो. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर जमिनीच्या मालकीचे कागद अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे.
लाखो शेतकऱ्यांना दिलासा...
आजवर या योजनेतून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा झाला असून, विशेषतः छोटे व अल्पभूधारक शेतकरी यांना शेतीच्या खर्चात दिलासा मिळाला आहे. हप्त्यांच्या स्वरूपात मिळणाऱ्या या रकमेचा वापर बियाणे, खते, सिंचन, मशागत आदीसाठी होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते.