लोणार तहसीलवर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा; शेतकरी कन्या संजीवनी वाघ यांचा सरकारवर घणाघात! सरसगट कर्जमाफी व पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनात आक्रमक...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सरसगट कर्जमाफी व संपूर्ण पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी योद्धा कृषी समितीच्या वतीने काल लोणार तहसीलवर विराट मोर्चा काढण्यात आला. शेतकरी कन्या संजीवनी वाघ यांनी शासनावर तीव्र शब्दांत टीका करताना, "सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला असून, मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्यासही मागे हटणार नाही," असा इशारा दिला.
मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी नेते बालाजी सोसे, दिलीप चौधरी, पंढरी पाटील आदी उपस्थित होते. २ जूनपर्यंत कर्जमाफी न झाल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असून, नंतर मुंबईत मुख्यमंत्री कार्यालयावर धडक देणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार भूषण पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, २००७ मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या लक्ष्मण मोरे यांच्या भावाने –ज्ञानेश्वर मोरे यांनी भावुक होत शेतकऱ्यांच्या लढ्याचा संकल्प व्यक्त केला.