ई-केवायसी व आधार सीडिंग न झाल्यास शेतकरी सन्मान निधीपासून वंचित राहण्याची शक्यता; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 
 बुलढाणा (जिमाका – बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जुलै 2025 मध्ये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता वितरीत होणार आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि आधार सीडिंगची प्रक्रिया अद्याप अपूर्ण असून, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
​​​​​​
जिल्ह्यातील 3 हजार 492 शेतकऱ्यांची ई-केवायसी तर 4 हजार 599 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, हे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
या योजनांतर्गत केंद्र शासनाकडून वार्षिक 6 हजार रुपये आणि राज्य शासनाकडूनही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6 हजार रुपये लाभार्थी शेतकरी कुटुंबांना देण्यात येतात. मात्र यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडिंग ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
शेतकऱ्यांनी आपले बँक खाते किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घेणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालय, कृषी सहाय्यक तसेच गावातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. वेळेवर प्रक्रिया पूर्ण न झाल्यास योजनांचा लाभ मिळणे कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.