मुख्य रस्ता तातडीने व्यवस्थित करा! – माजी पंचायत समिती सदस्य श्रीधर राऊत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे तक्रार
Jun 18, 2025, 14:05 IST
खामगाव (भागवत राऊत, बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
पातोंडा - पेडका गावाला जोडणारा मुख्य रस्ता निकृष्ट दर्ज्याचा बनवला जात असल्याची गंभीर तक्रार माजी पंचायत समिती सदस्य श्रीधर राऊत यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.
खामगाव-मेहकर मार्गावर असलेले पातोंडा-पेडका गाव मुख्य रस्त्यापासून अवघ्या दीड किलोमीटरवर आहे. सध्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून संथ गतीने व निष्काळजीपणे सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला ठेकेदाराने रस्ता केवळ उकरून ठेवला होता, आणि काम जवळपास तीन महिने बंद पडले होते. अलीकडेच पुन्हा कामाला सुरुवात झाली असली तरी रस्त्याचे आधीचे डांबर न काढताच थेट मुरूम टाकून काँक्रीटचे काम सुरू करण्यात आले आहे.
या अपूर्ण व अनास्थापूर्ण कामामुळे दररोज शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाल्यांचे खोलीकरण गरजेपेक्षा अधिक केल्यामुळे रस्त्यालगतची शेती गाठणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, पेरणीचा हंगाम सुरू असूनही कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
श्रीधर राऊत यांनी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, या रस्त्याचा टिकाव लागेल का? याबद्दलच शंका व्यक्त केली आहे. गावाचा हा मुख्य रस्ता असल्याने यावरून मोठ्या जड वाहनांची ये-जा होते. त्यामुळे रस्ता अधिक मजबूत आणि दर्जेदार बनवण्याची गरज असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी आणि कामाची तातडीने चौकशी करून रस्ता दर्जेदार व शाश्वत बनवावा, अशी मागणी ग्रामस्थांमध्येही जोर धरत आहे.