शेतकऱ्याच्या स्वप्नाची राखरांगोळी; मेहनतीने पिकवलेल्या गव्हाला विकृताने लावली आग!; नांदुरा तालुक्यातील घटना
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात लावलेली गव्हाची गंजी कोणीतरी आग लावून पेटवून दिली. यात 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना येरळी (ता. नांदुरा) येथे 3 एप्रिलच्या रात्री 10.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी 6 एप्रिलला शेतकऱ्याने नांदुरा पोलिसांत तक्रार दिली आहे.
महादेव हरिभाऊ लोणाग्रे (29, रा. येरळी) यांनी 6 एप्रिल रोजी नांदुरा पोलीस ठाण्याला तक्रार दिली की, माझी येरळी गावाला लागून गट नं. 12 मध्ये दोन एकर शेती असून, त्यात मी गहू पिक लागवड केली होती. दोन दिवसांपूर्वी शेतात गव्हाची गंजी लावली होती. 3 एप्रिल रोजी रात्री 10.30 गावातील रहिवासी अरुण किशोर वेरुळकर यांनी घरी येऊन सांगितले की तुमच्या शेतात आग लागून जाळ दिसत आहे. गावातील वाल्मिक रमेश मुकुंद, सागर उल्हासराव भगत, सुनील काशीराम लोनाग्रे असे सर्व मिळून आम्ही शेतात जाऊन पाहिले असता गंजी पूर्णपणे खाक झालेली दिसली. कोणीतरी आग लावून 40,000 ते 50,000 रुपयांचे नुकसान केले. मी आग लावणाऱ्यांचा आजपर्यंत शोध घेतला. परंतु काही पत्ता लागला नाही. पोलिसांनी आग लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आग कुणी लावली याचा शोध घेतला जात आहे.