क्षणांत होत्याचं नव्हत झालं; तिघांच्या अपघाती मृत्यूने चिखली तालुक्यावर शोककळा;
गोपाल आणि धनंजय आईवडिलांना एकुलते एक! धनंजयचा याआधीही झाला होता अपघात! संजयच्या चिमुकलीला आता पप्पा दिसणार नाही....
Updated: Oct 9, 2024, 20:26 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्षणांत सगळचं संपल...होत्याचं नव्हत झालं.. हसते खेळते ३ कुटुंब दुःखाच्या काळ्या सागरात बुडाले...काल, ८ ऑक्टोबरचा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरला..खरतर "त्या" तिघांनी अजून खूप काही दुनियादारी अनुभवली नव्हती...अजून बरच काही करण्याचं बळ त्यांच्या पंखात होत..मात्र नियतीने असा क्रूर सुड उगवला की आता फक्त त्या तिघांच्या आठवणीच शिल्लक उरल्या आहेत... बेराळ्या चा गोपाल सुरडकर(२१) वाघापूरचा धनंजय ठेंग(२४)आणि रायपुरचा सुनील सोनुने (३०) अशी त्या तिघांची नावे....तिघांच्या अपघाती मृत्यूने चिखली तालुक्यावर शोककळा पसरली आहे..
चिखली ते लव्हाळा दरम्यान असलेल्या वरदडा फाट्याजवळ दुचाकी बंद पडलेल्या एसटी बसला धडकली, आणि "त्या" तिघांचा आयुष्याच्या सुंदर वळणावर सुरू झालेला प्रवास कायमचा बंद झाला. निळ्या रंगाची एसटी महामंडळाची बस बंद पडलेली, ती त्यांना दिसलीच नाही अन् त्यांची मोटारसायकल जोरात त्या बसवर आदळली.. गोपाल, धनंजय, सुनील रक्ताच्या थारोळ्यात पडले..अपघात येवढा भीषण होता की त्या तिघांचा घटनास्थळीच जीव गेला..अपघातात ठार झालेले तिघे तरुण आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून सौर ऊर्जेचे प्लेट बसवण्याचे काम करत होते..त्या कामासाठी ते मेहकरला गेले होते. काम आटोपून परत येत असताना त्यांना एसटी बसच्या रूपाने काळ आडवा आला अन् घात झाला...👇
अपघातात ठार झालेला गोपाल हा सामान्य शेतकरी कुटुंबातला तरुण..यंदाच्या उन्हाळ्यात बहिणींचं लग्न झालं..दोन पैसे मिळाले तर आईवडिलांना मदत होईल म्हणून शिक्षणासोबत गोपाल पार्ट टाईम जॉब करायचा..अतिशय मनमिळावू, दोस्तांच्या गर्दित वावरणारा गोपाल आज आपल्यात नाही हे मान्य करायला त्याचे मित्र तयार नाहीत..गोपाल आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी आई वडिलांचा तोच एकमेव आधार होता...मात्र हा आधार आता संपलाय..गोपालच्या आई वडिलांच्या डोळ्यांतील आसवांचा पूर थांबत नाहीये..
धनंजयचा याआधीही झाला होता अपघात...
धनंजय परमेश्वर ठेंग (२४) हा वाघापुरचा..आई वडील गुजरात मधील वापी येथे एका कपड्याच्या कंपनीत मजुरीचे काम करतात.. धनंजय देखील आई-वडिलांना एकुलता एक..तो लहानाचा मोठा झाला तो गुजरात मध्येच..दीड वर्षाआधी धनंजयचा गुजरात मध्येच भीषण अपघात झाला होता,तब्येत सिरियस होती.डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून तेव्हा त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवले होते.मात्र जवळपास सहा महिने तो बेडवरच होता..७ - ८ महिन्याआधी तो गावाकडे म्हणजेच वाघापुरला आला.. जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथे त्याने बीकॉम च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. गावाकडे काका सदाशिव ठेंग यांच्याकडेच धनंजय रहायचा..ओळखीतून त्याने देखील पार्ट टाइम जॉब सुरू केला..मात्र तो जॉब त्याच्या जीवावर उठणार याची त्याला कोणतीही कल्पना नव्हती..
आता पप्पा कुणाला म्हणणार वैष्णवी?
याच अपघातात रायपूर येथील होतकरू तरुण सुनील सोनुने(३०) हा देखील ठार झाला. रायपूर परिसरात सोनुने कुटुंब सर्पमित्र म्हणून फेमस आहे..वडील सुभाष आणि प्रमिलाबाई यांच्या ३ मुलांपैकी सुनील सर्वात धाकटा..थोरला मुलगा राजू सोनुने याचेही दोन वर्षाआधी निधन झाले.. मधवा संजय हा गावाकडे रायपूर येथे शेती सांभाळतो तर सुनील सासुरवाडी असलेल्या खडकपुरा(चिखली) येथे पत्नी जागृती सोबत राहत होता..सुनील सौर ऊर्जेचे प्लेट लावण्याचे काम मजुरी तत्वावर करत होता..सुनीलला एक मुलगी असून तिचे नाव वैष्णवी(६) आहे.

अतिशय कष्टाने मोलमजुरी करून सुभाष सोनुने आणि प्रमिलाबाई यांनी मुलांना शिकवलं, त्यांची लग्न केली...संसार उभा केला..मात्र स्वतःच्या डोळ्यादेखत दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ते आतून पूर्णपणे खचले आहेत.. सुनीलची पत्नी जागृतीचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे..संसार फुलत असताना वेल कापल्या गेल्याने तिचे दुःख कल्पनेच्या पलीकडचे आहे. मुलगी वैष्णवी पप्पा कुणाला म्हणणार? तिचे लाड आता कोण करणार..हा आर्त सवाल अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे...