‘दिशा’ समितीची बैठक पार पडली : केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा – ना. प्रतापराव जाधव यांचे प्रशासनाला निर्देश
Apr 29, 2025, 20:26 IST
बुलडाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष ना. प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी दिले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
पहलगाव हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
बैठकीच्या प्रारंभी जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बैठक कार्यवाहीला सुरुवात झाली.

सिंचन प्रकल्प, पुनर्वसन व भूसंपादनावर भर
या बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, भूसंपादन प्रक्रिया, व मोबदला वितरण यावर चर्चा करताना ना. जाधव यांनी स्पष्ट केले की, पुनर्वसन ठिकाणी पायाभूत सुविधा – रस्ते, पाणी, वीज यांची सोय असावी. जागा हस्तांतरणाचे प्रस्ताव निकाली काढण्याचेही निर्देश देण्यात आले. तसेच, जिगाव प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
पीक विमा आणि किसान सन्मान निधी योजनांचा आढावा
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२३-२४ या वर्षात ४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपये मंजूर झाले होते, त्यातील ४२९ कोटी वितरित करण्यात आले. उर्वरित रक्कम खात्याशी आधार लिंक नसल्याने प्रलंबित आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांशी संपर्क साधावा, ई-केवायसी पूर्ण न झालेल्यांना मार्गदर्शन करावे, असे ना. जाधव यांनी सांगितले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतही ई-केवायसी अडचणी दूर करून शेतकऱ्यांना लाभ मिळावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतरस्त्यांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
ग्रामीण भागातील शेतरस्ते व पाणंद रस्त्यांसाठी कृती आराखडा तयार करावा, शेतकऱ्यांच्या मागण्या समाविष्ट करून ग्रामसेवकांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही ना. जाधव यांनी दिले.
विविध योजनांचा सविस्तर आढावा
या बैठकीत प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मनरेगा, जलजीवन मिशन, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, कौशल्य विकास योजना, पीएम श्री शाळा, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे प्रकल्प व गृहनिर्माण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, विविध प्रकल्प अधिकारी आणि विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.