पहलगाम हल्ल्यावर शिवसेना (उबाठा) कडून संताप व्यक्त; काळी फित बांधून निषेध, केंद्र सरकारने "जशास तसे" उत्तर देण्याची मागणी

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने बुलडाणा येथे काळी फित बांधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या निषेध आंदोलनावेळी “पाकिस्तान मुर्दाबाद” च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने केंद्र सरकारकडे जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली असून "त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे" अशी संतप्त प्रतिक्रिया उबाठा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली.
या वेळी शिवसेना (उबाठा) गटाचे राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंत भोजने, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, जिल्हा संघटक दत्तात्रय लहाने, बुलडाणा तालुकाप्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद सोफियान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दहशतवाद्यांच्या या कृत्यामुळे देशाच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे भूमिका शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली . बुलडाणा जिल्ह्यातील विविध भागांतूनही या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.