उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक; तुपकर यांच्या इशाऱ्यानंतर सकाळपासून पोलिस कारवाई..
Jun 12, 2025, 08:30 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून जिल्ह्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ११ जून रोजी शेगाव येथील सभेत सरकारवर जोरदार हल्ला चढवत शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी विनायक सरनाईक आणि कार्यकर्ते यांना चिखली पोलिसांनी सकाळी ६ वाजताच त्यांच्या राहत्या घरी जाऊन ताब्यात घेतले. अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात सध्या शेतकरी संकटात असून, सोयाबीन, कापूस आणि कांद्याला भाव नाही, पेरणीच्या तोंडावर पीककर्ज मिळालेले नाही आणि कर्जमाफी अद्यापही न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच मुद्द्यांवर तुपकर यांनी सरकारला इशारा देताना, “शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत, तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांचे समर्थक सरकारविरोधात काही आंदोलन करणार असल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी सकाळपासून धरपकड सुरू केली आहे.
शेतकरी संघटनेकडून सरकारवर टीका करताना म्हटले गेले आहे की, “पोलीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन चिरडण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत.”
दरम्यान, मोझरी येथे मंत्री बच्चू कडू हेही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असून, त्या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी या पार्श्वभूमीवर अधिक तीव्रतेने समोर येत आहे.
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला प्रशासनाने अटकांद्वारे दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, सरकारने आता तरी आपली आश्वासने पाळून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरू लागली आहे.