हा रडीचा डाव! पराभव समोर दिसतोय म्हणून असल्या उचापत्या! आ. श्वेताताई महालेंचे महाविकास आघाडीच्या आरोपांना प्रत्युत्तर!

 म्हणाल्या, स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवता येईल पण मतदान नाही....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडीला पराभव समोर दिसत आहे. राज्य सरकारने आपल्या लोकोपयोगी योजनेतून जी लोकप्रियता मिळवली त्यामुळे महाविकास आघाडी पराभवाच्या छायेखाली आहे. ते मनाने आत्ताच पराभूत झाले आहेत. या मानसिक धक्क्यातून सावरता येत नसल्याने ते काहीही बेताल आरोप करतात..मात्र सत्य समोर आल्यावर तोंडावर पडतात, हा रडीचा डाव आहे असे परखड प्रत्युत्तर आ. श्वेताताई महाले यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातली महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याचा आरोप करीत त्याला उपमुख्यमंत्री कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला होता, त्यानंतर मुंबईत महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील याचा पुनरुच्चार केला होता त्यावर आमदार महाले यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. चिखलीत गेल्या काही दिवसांपासून स्टंटबाजी सुरू आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेण्यात येत आहे, मात्र स्टंटबाजी करून प्रसिध्दी मिळवता येईल मात्र मतदान नाही असा हल्लाबोल देखील आमदार महाले यांनी केला आहे.पराभूत मानसिकतेमुळे असल्या उचापत्या करण्याची त्यांची जुनी सवय आहे असेही त्या म्हणाल्या..

महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे यादीतून गायब करण्यात आल्याचा आरोप खोटा आहे. त्यातल्या त्यात यात उपमुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेणे हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. त्यांनी जी दोन नावे गायब झाल्याचे सांगितले ती सौ .गाडेकर आणि सपकाळ ही दोन्ही नावे यादीत आहेत. मी स्वतः तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून त्याबद्दलची माहिती घेतली आहे असे आमदार श्वेताताई म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटीव्ह सेट केल्यामुळे महाविकास आघाडीला जे काही थोडेफार यश मिळाले त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत..मात्र जनता हुशार आहे,जनतेला सगळ काही कळत..याचे उत्तर मतदानातूच जनता देईल असेही आमदार श्वेताताई म्हणाल्या..

मतदार नोंदणीसाठी आम्ही पुढाकार घेतला...
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे १०० टक्के मतदान व्हावे, मतदान नोंदणी व्हावी यासाठी आम्ही कायमच आग्रह धरला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात आम्ही नवमतदारांच्या नोंदणीचे काम केले. त्यावेळी कोणताही भेदभाव आम्ही केला नाही..कोण कोणत्या पक्षाचा मतदार आहे याचा विचार नोंदणी करून घेतांना केला नाही..आम्ही राष्ट्रीय कार्यासाठी पुढाकार घेतला असेही आमदार श्वेताताई म्हणाल्या...