EXCLUSIVE गायत्री शिंगणेंचा बालहट्ट! केवळ शिंगणे आडनाव या आधारावर गायत्री शिंगणे मैदानात? राजकीय उदयाआधीच अस्त होण्याची शक्यता....

 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरेतर लोकशाहीत कुणालाही निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे हे नाकारता येणार नाही. मात्र केवळ आडनाव शिंगणे आहे म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची घाई जर गायत्री शिंगणे करीत असतील तर ते स्वतः स्वतःच्या पायावर दगड टाकण्यासारखे होईल. हा सुर उमटतोय तो सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्षे शिंगणे परिवारावर निस्सीम प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा...मात्र गायत्री शिंगणे कुणाचेही ऐकायला तयार नाहीत..अगदी ज्यांनी अंगा-खांद्यावर खेळवले त्या कुटुंबीयांचे देखील त्या ऐकायला तयार नाहीत..काहीही झाले तरी सख्ख्या काकांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवायचीच असा हट्ट (बालहट्ट) त्यांनी धरला आहे...त्यामुळे खरेतर भविष्य चांगले(?) असतानाही राजकीय उदयाआधीच गायत्री शिंगणे यांचा अस्त होण्याची शक्यता आहे....

 जिल्हा बँकेच्या हितासाठी डॉ.राजेंद्र शिंगणे सत्ताधारी अजित पवार गटासोबत गेले. जिल्हा बँकेला ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोनही मिळाले. या वर्ष सव्वा वर्षाच्या काळातही डॉ.शिंगणे यांनी शरद पवार विरोधी भूमिका घेतली नाही, उलट मित्र पक्षातील नेते जेव्हा शरद पवारांवर बोलायचे तेव्हा डॉ.शिंगणे उघडपणे त्याचा निषेध करायचे. मात्र दुसरीकडे याच काळात गायत्री शिंगणे यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेला धुमारे फुटू लागले. डॉ.राजेंद्र शिंगणे या आपल्या काकांच्या विरोधातच गायत्री शिंगणे यांनी मोहीम उघडली. खरेतर कुटुंब म्हणून काही मर्यादा पाळायच्या असतात मात्र त्याही न पाळता त्या मिडीयाला बाईट देत राहिल्या.."काका- पुतणी" असा राजकीय चर्चेतला विषय असल्याने मीडियानेही बऱ्यापैकी कव्हरेज दिले आणि गायत्री शिंगणे यांना स्वतःला नेता झाल्यासारखे वाटू लागले. अर्थात एखादे महिला नेतृत्व समोर येत असेल तर ती गोष्ट चांगलीच..मात्र काकांच्या विरोधातच गायत्री शिंगणे यांनी घेतलेली भूमिका मतदारसंघातील जनतेला फारशी काही पटलेली दिसली नाही. शिंगणे कुटुंबातील सदस्य म्हणून अनेकांची गायत्री शिंगणे यांच्या प्रती सहानुभूती आहे, या सहानुभूती पोटीच गायत्री शिंगणे यांची सध्याची भूमिका चुकीचीच असे अनेक जण म्हणत आहेत..मात्र या सहानुभूतीचा चुकीचा अर्थ गायत्री शिंगणे यांच्याकडून लावला जातोय असे दिसतेय.."काका आपल्या विरोधात लढायला घाबरलेत" असा गैरसमज गायत्री शिंगणे यांनी करून घेतलेला दिसतोय..

 उदयाआधीच राजकीय अस्त?
गायत्री शिंगणे यांनी संयमी भूमिका घेतली तर भविष्याच्या राजकारणासाठी त्यांना फायदा होऊ शकतो. मात्र समाज मनाला न पटणारी भूमिका त्यांनी घेतली तर मात्र राजकीय उदया आधीच त्यांचा अस्त होईल अशी भीती त्यांच्या हितचिंतकांना आहे...