दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका जगाला पटवण्यात डॉ.श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ यशस्वी – प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन! डॉ. श्रीकांत शिंदेंची भेट घेऊन केला सन्मान.....
Jun 6, 2025, 09:19 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आणि या दहशतवाद्यांचा त्रास भारतासह अनेक देशांना सहन करावा लागत आहे. दहशतवादाचा जागतिक स्तरावर बंदोबस्त करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे, हे पटवून देण्यात शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ यशस्वी ठरले, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. शिंदे यांचा सत्कारही केला.
पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. भारताच्या या कारवाईची माहिती जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खासदारांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांच्या दौर्यावर पाठवण्यात आले होते.
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ युएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओन या देशांच्या दौर्यावर गेले होते. या दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात दिल्लीत अर्धा तास झालेल्या औपचारिक चर्चेदरम्यान, दोन देशांनी भारताच्या कारवाईचे उघडपणे समर्थन केल्याची माहिती देण्यात आली. दहशतवादाच्या विरोधात भारताच्या भूमिकेचा त्यांनी पाठिंबा दर्शविला, ही गोष्ट या दौऱ्याचे यश दर्शवणारी आहे.
या चर्चेप्रसंगी शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचीही उपस्थिती होती.