ना.प्रतापराव जाधवांकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन! म्हणाले, भारत दहशतवाद खपवून घेणार नाही!
२२ एप्रिल रोजी पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर धर्म विचारून गोळीबार केला होता. यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आणि कठोर भूमिकेनंतर सैन्याने काळजीपूर्वक नियोजन करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर लक्ष्य केले. ही कारवाई केवळ सैन्याची ताकद नव्हे तर राजकीय नेतृत्वाच्या दृढतेचे प्रतीक ठरली असल्याचेही ना.जाधव म्हणाले.
सैनिकांचे अभिनंदन करताना जाधव म्हणाले, "देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना होती. ती आज पूर्ण झाली आहे. अशा कारवायांसाठी राजकीय इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची असते आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात ती स्पष्ट दिसते."
"ऑपरेशन सिंदूर" ही कारवाई देशाच्या सीमेपलिकडे जाऊन दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारी ठरली आहे. यामुळे भारतीय नागरिकांचा आपल्या सैन्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अशा कारवाया भविष्यातही सुरूच राहतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.