ना.प्रतापराव जाधवांकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन! म्हणाले, भारत दहशतवाद खपवून घेणार नाही!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने आज पहाटे "ऑपरेशन सिंदूर" राबवत पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या जोरदार कारवाईत भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौसेनेचा समन्वय साधत आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात भारताची भूमिका पुन्हा अधोरेखित केली.केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या सैनिकी कारवाई बद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे. याबद्दल प्रतिक्रिया देतांना  ते म्हणाले की,“देशवासीयांची एकजूट, राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्याची गगनभेदी कारवाई यामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले.”

२२ एप्रिल रोजी पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर धर्म विचारून गोळीबार केला होता. यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आणि कठोर भूमिकेनंतर सैन्याने काळजीपूर्वक नियोजन करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर लक्ष्य केले. ही कारवाई केवळ सैन्याची ताकद नव्हे तर राजकीय नेतृत्वाच्या दृढतेचे प्रतीक ठरली असल्याचेही ना.जाधव म्हणाले.

सैनिकांचे अभिनंदन करताना जाधव म्हणाले, "देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना होती. ती आज पूर्ण झाली आहे. अशा कारवायांसाठी राजकीय इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची असते आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात ती स्पष्ट दिसते."
"ऑपरेशन सिंदूर" ही कारवाई देशाच्या सीमेपलिकडे जाऊन दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारी ठरली आहे. यामुळे भारतीय नागरिकांचा आपल्या सैन्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अशा कारवाया भविष्यातही सुरूच राहतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.