ग्रा.पं.निवडणुकीतील धुसफूस जाईना; उमेदवाराच्या मुलाच्या डोक्यात दगड घातला, जळगाव जामोद तालुक्यातील घटना
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीतील वादावरून हाणामारी होऊन त्यात 1 जण जखमी झाला. ही घटना चालठाना (ता. जळगाव जामोद) येथे काल, 29 मार्चला रात्री घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालठानाची यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. निवडणुकीत तोताराम मोतीराम निहाल व तुकाराम माटू निहाल यांच्या लढतीत तोताराम मोतीराम निहाल विजयी झाले होते. निवडणुकीपासून दोन्ही परिवारामध्ये धुसफूस होती. काल रात्रीच्या सुमारास तोताराम निहाल यांचा मुलगा मुन्शी तोताराम निहाल हा गावातील किराणा दुकानावर गेला असता तिथे अनंता तुकाराम निहाल, विजय तुकाराम निहाल, अविनाश अनंता निहाल यांनी मुन्शीला शिवीगाळ केली. मुन्शीने शिविगाळ का करता असे विचारले असता अनंता निहाल याने मुन्शीच्या डोक्यात दगड घातला. यात तो गंभीर जखमी झाले. याप्रकरणी आज, 30 मार्चला सकाळी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मुन्शीने दिलेल्या तक्रारीवरून अनंता, विजय, अविनाश (रा. चालठाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.