चिल्लर कारणावरून वाद विकोपाला गेला! एकाने काठी मारली, दुसऱ्याने पाठीत खंजीर खुपसला! खामगाव तालुक्यातील घटना....

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून काठीने मारहाण, तसेच दुसऱ्याने पाठीवर चाकूने हल्ला केल्याची घटना तालुक्यातील गणेशपूर येथे घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दीपक पांडुरंग भालेराव, (रा. गणेशपूर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काल ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास राजू गजानन भालेराव घटनास्थळी आला. त्याने दीपक याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. वाद विकोपाला गेला असता, लल्ला रामा बाजोडे याने हातातील काठीने दीपकच्या पाठीवर, तोंडावर आणि डोक्याच्या मागच्या बाजूस मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी यश गणेश तायडे यानेही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले.हिवरखेड पोलिसांनी राजू गजानन भालेराव (रा. गणेशपूर), लल्ला रामा बाजोडे (रा.गोमटगिरी, इंदूर), व यश गणेश तायडे (रा. पारखेड, ता. शेगाव) यांच्याविरुद्ध कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३ (५) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.