भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली; पती-पत्नीचा मृत्यू; तेलंगणातून पाचोरा येथे जात असताना घडला अपघात; वडनेर भोलजी परिसरातील घटना..!

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तेलंगणातून पाचोरा येथे जात असलेल्या दाम्पत्याची भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहीरीत कोसळली. यामध्ये पती आणि पत्नीचा मृत्यू झाला.ही घटना 29 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.  पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे.  
जळगांव खांदेश जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथे राहणारे परंतु नोकरीनिमित्त तेलंगणात वास्तव्यास असलेले पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील हे पती-पत्नी विवाह सोहळ्यासाठी स्वतःच्या कारने तेलंगणाहून पाचोऱ्याला जात होते. दरम्यान,  शुक्रवारी ते जळगाव खांदेश येथे पोहचणे अपेक्षीत होते. मात्र ते पोहचले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. त्यांचे शेवटचे लोकेशन हे वडनेर भोलजी शिवारात दाखवत होते. अखेर शनिवारी या दाम्पत्याची कार वडनेर भोलजी शिवारात असलेल्या विहीरीत आढळली. तसेच यामध्ये पती पत्नीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तेलंगणा राज्यातील सुर्यपेठ जिल्ह्यात झुआरी सिमेंट कंपनीत ते गत ५ वर्षांपासून नोकरीला होते. दरम्यान, रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहीरीत हे मृतदेह आढळल्याने नेमका अपघात झाला कि घातपात हे पोलीस तपासात समोर येणार आहे.