"माहेरहून दोन लाख घेऊन 'ये', तरच तुला वागवतो!" — गोंधनापूरच्या अश्विनीचा हिंगोलीत सासरी छळ; आठ जणांविरोधात गुन्हा

 
 खामगाव (प्रतिनिधी – भागवत राऊत, बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
खामगाव तालुक्यातील गोंधनापूर गावातील सौ. अश्विनी युवराज वाघमोडे (वय २८) या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सासरच्या आठ जणांविरोधात खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. अश्विनी यांचा विवाह युवराज दीपक वाघमोडे (रा. कोथळज, ता. हिंगोली) यांच्यासोबत झाला होता. मात्र, लग्नानंतर तिच्यावर पती युवराज वाघमोडे तसेच दीपक तुकाराम वाघमोडे, मनोज दीपक वाघमोडे, वंदना दीपक वाघमोडे (सर्व रा. कोथळज, हिंगोली), तसेच अवधूत बबन म्हस्के, क्रांती अवधूत म्हस्के, रंगराव बबन म्हस्के आणि रोहिणी रंगराव म्हस्के (सर्व रा. धनसळ, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी संगनमत करून छळ सुरू केला.
या सगळ्यांनी मिळून अश्विनी यांच्यावर १७ ऑगस्ट २०२४ पूर्वी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला. पैसे न आल्यास सन्मानाने वागवणार नाही, असे म्हणत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला.
या बाबत सौ. अश्विनी यांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल भगवान काळबागे करीत आहेत.