“रात्रच नव्हे, दिवसही चोरट्यांचाच!” — मेहकरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लंपास...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रात्रपाळीतील चोऱ्या कधीकधी समजण्यासारख्या मानल्या जातात. मात्र, भरदिवसा घरफोडी होत असेल तर मेहकरवासीयांनी आता रात्रच नाही, तर दिवसही चोरट्यांचाच आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवार, ८ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांवर पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शहरातील शिक्षक कॉलनीत राहणारे जी. डी. राठोड यांच्या मालकीच्या घरात सिद्धू पवार हे भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. गुरुवारी दुपारी पवार यांच्या पत्नी मैत्रिणीसोबत बाहेर गेल्या होत्या. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सुमारे अर्धा तास घराची झडती घेत चोरट्यांनी घरातील कपाट उघडले. कपाटाला कुलूप नसल्याचा फायदा घेत त्यांनी अंदाजे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले तसेच एक हजार रुपये रोख, असा एकूण सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

अर्ध्या तासानंतर पवार यांच्या पत्नी घरी परतल्या असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती तत्काळ परिसरातील नागरिकांना देण्यात आली.

मेहकर शहरात मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. शिक्षक कॉलनी, पवनसूत नगरसह शहरातील विविध भागांत चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, चोरट्यांना मेहकर पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे पवनसूत नगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या भरवशावर न राहता स्वतःच गट तयार करून रात्रीचा पहारा सुरू केला आहे. मात्र, आता रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही घरफोड्या होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी मेहकरवासीयांकडून होत आहे.