धोका..! नवव्या वर्गातील मुलीचे लावले लग्न! नवरदेवाच्या बापाने अमिष काय दाखवलं? करवंडची नवरी अन् डोंगरखंडाळ्याचा नवरदेव! किन्होळ्यात लागले लग्न..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी गावपातळीवर देखील जनजागृती केली जाते. मात्र तरीही काही लोक निरागस चिमुकलीचा बालविवाह लावून देतातच. चिखली तालुक्यातील करवंडच्या एका मुलीसोबत असाच धक्कादायक प्रकार घडला..याप्रकरणातील आरोपी नवरदेव डोंगरखंडाळा येथील राहणारा आहे. नवरदेवासह ६ जणांविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वैभव एकनाथ सावळे असे गुन्हा दाखल झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. याशिवाय नवरदेवाचे वडील एकनाथ नागोराव सावळे, आई सौ.कुसुमबाई, किन्होळा येथील पूजा बाहेकर, पूजा बाहेकर यांचे पती आणि पूजा बाहेकर यांची सासू अशा ६ जणांविरुद्ध पीडित मुलीने तक्रार दिली आहे.
मोठी मुलगी आणून देण्याचे आमिष दाखवले...
तक्रारीनुसार पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचे मोताळा तालुक्यातील काबारखेड येथील गोपाल अशोक सोनवणे याने मागील महिन्यात अपहरण केलेले आहे. त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. ही बाब मुलीच्या वडिलांनी नातेवाईक असलेल्या डोंगरखंडाळा येथील एकनाथ सावळे यांना सांगितली. तुम्हाला माझ्या मुली बद्दल काही माहिती आहे का अशी विचारणा केली यावर एकनाथ सावळे यांनी " तुमच्या लहान मुलीचे माझ्या मुलासोबत लग्न लावून द्या तुमची मोठी मुलगी मी आणून देतो" असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून मुलीच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला.मुलीसह तिच्या नातेवाईकांचा देखील या लग्नाला विरोध होता..दरम्यान २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता किन्होळा येथे हे लग्न लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चाइल्ड लाईनला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर प्रशासनाने त्यावर तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई केली आहे. पीडित मुलीला बुलढाणा येथील सखी वन स्टॉप सेंटर येथे ठेवण्यात आलेले असून चिखली पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.