BREKING बापाची ४ लेकरांसह आत्महत्या! आधी मुलांना विहिरीत ढकलले! नंतर विहिरीच्या कड्याला घेतला गळफास! ५ मृतदेह पाहून गाव हळहळले...

 आदल्या दिवशी भांडण झाल्याने बायको गेली होती माहेरी! जळगाव जामोद तालुक्यातील घटना
 
 जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातून अख्ख्या जिल्ह्याला पाझर फोडणारी घटना समोर आली आहे. ही घटना मन हादरवून सोडणारी आहे..काळीज पिळवटून टाकणारी आणि डोक सुन्न करणारी आहे.. नवरा बायकोच्या भांडणातून बायको माहेरी निघून गेली, त्यानंतर घरी राहिलेल्या बापाने स्वतःच्या ४ मुलांना आधी विहिरीत ढकलून दिले नंतर स्वतः आत्महत्या केली. ४ कोवळ्या निरागस मुलांसह बापाने आत्महत्या केल्याने अख्खे गाव हळहळले आहे.
विजय मुसा किराडिया (३५) वडील, प्रीत विजय किराडिया(७), प्राची विजय किराडिया(५), पूर्वी विजय किराडिया(४) आणि पीयूष विजय किराडिया(२) अशी मृतुकांची नावे आहेत. घटना जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील आहे..
प्राप्त माहितीनुसार काल संध्याकाळी विजय किराडिया आणि त्यांच्या पत्नीचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. या भांडणामुळे पत्नी चिमुकल्यांना सोडून माहेरी जवळच असलेल्या इस्लामपूर येथे निघून गेली. दरम्यान आज सकाळी विजय उठला.. चिमुकल्यांना चहा करून पाजला..त्यानंतर विजय घरासमोर चहाचे भांडे धूत होता. त्यावेळी विजय चे वडील तिथे आले..
विजय घरातली कामे करत असल्याचे पाहून, तू का घरातली कामे करतो आहेस, बायको कुठे ? अशी विचारणा विजयच्या वडिलांनी केल्यानंतर विजयचा राग अनावर झाला. चिमुकल्यांना घेऊन विजय जवळच्या एका शेतातील विहिरीवर गेला. तिथे दोन मुले आणि दोन मुलींना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर विहिरीच्या कडेला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी दोर तुटल्याने विजय देखील विहिरीत पडला.. काही वेळाने त्या शेतातील शेतकरी शेतात आल्यानंतर काठावर मोबाईल चपला आणि विहिरीच्या कडेला तुटलेली दोर आढळून आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह वर काढले.. पाचही मृतदेह उत्तर तपासणीसाठी जळगाव जामोद येथे नेण्यात आले आहेत.