भरधाव टिप्परने झाडाखाली बसलेल्या दोघांना चिरडले! संतप्त ग्रामस्थांनी टिप्पर पेटवले ; जळगाव जामोद तालुक्यातील घटना....

 
 जळगांव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव टिप्परने दोन पादचाऱ्यांना चिरडल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी टिप्परला आग लावून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. काल बुधवार २२ मे च्या रोजी दुपारच्या सुमारास दादूलगाव येथे हा अपघात झाला. १५ दिवसांपूर्वी देखील भरधाव टीप्परच्या धडकेत दोन चिमुकले जागीच तर एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 

 
काशीनाथ झाल्टे (४०), समाधान काळे (५५), हे दोघे दादूलगाव येथील हनुमान मंदिरासमोरील वडाच्या झाडाखाली बसले होते. दरम्यान, मानेगावहून भरधाव आलेल्या टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर गेले. या अपघातात झाल्टे यांचे दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून, समाधान काळे यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. दोघांनाही तत्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी टिप्परला आग लावली. आगीत वाहनाचा पुढील भाग जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.