राज्यकर्त्यांनो, शेतकऱ्याची अवस्था बघा… 40 हजारांचे कर्जही फेडता आले नाही म्हणून मरण कवटाळले!
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मासरूळ (ता. बुलडाणा) येथील तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात काल, 12 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर एसबीआयच्या धाड शाखेचे 40 हजार रुपयांचे कर्ज होते.
मासरूळ येथील अल्पभूधारक शेतकरी सुशिलाबाई शंकर सपकाळ यांना तीन मुले असून, सर्वांत मोठ्या विकासने हे टोकाचे पाऊल उचलले. सततची नापिकी आणि कोरोनामुळे हाताला काम नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करावा, कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तो होता, असे त्याच्या कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. विकासच्या वडिलांचे 3 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. अवघ्या 2-3 एकर कोरवाहू शेतीवर या कुटुंबाचा रहाटगाडा चालत होता. विकास यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, भावजयी, पुतणे असा परिवार आहे. धाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ परमेश्वर राजपूत, पोकाँ सुनील चौधरी करत आहेत.