वय निघून चाललेय, सैन्य भरती प्रक्रिया तातडीने राबवा!; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात बुलडाण्यात उमेदवारांचा मोर्चा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन वर्षांपासून केंद्र सरकारने सैन्यभरती केली नाही. कोरोनाचे कारण समोर करत सैन्यभरतीची प्रक्रिया समोर ढकलण्यात आली. त्यामुळे सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचे वय निघून जात आहे. मैदानावर घाम गाळून मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी सैन्यभरती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी अन्यथा संसदेला घेराव घालू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज, १ सप्टेंबरला दिला. सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या बुलडाण्यातील तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व श्री. तुपकरांनी केले. यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारने भरती प्रक्रिया राबवून २ वर्षे वयात सूट द्यावी. निमलष्करी दलात १ लाख २७ हजार पदे रिक्त असताना केंद्र सरकारने केवळ २५ हजार पदांसाठी जाहिरात काढली आहे. या जागा कमीकमी ७५ हजार तरी भराव्या, अशी मागणीसुद्धा श्री. तुपकर यांनी केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. जिजामाता महाविद्यालयातून निघालेला हा मोर्चा पोलीस स्टेशन, तहसील चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चाचा समारोप आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. देशसेवेची संधी मागणाऱ्या तरुणांनी राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप केला. यावेळी रस्त्याने जाणारे देशप्रेमी नागरिक सुद्धा राष्ट्रगीत सुरू होताच रस्त्यावर थबकले!