उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुसरबीडमध्ये पाणीटंचाई; संतप्त महिलांची ग्रामपंचायतीत धडक नियमित पाणीपुरवठ्याची मागणी; सरपंच-सचिव अनुपस्थित असल्याने महिलांचा संताप !

 
 दुसरबीड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : उन्हाळ्याची चाहूल लागताच दुसरबीड परिसरात पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची जोरदार मागणी केली.
गावातील अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे पाण्याचा ताण वाढत असून महिलांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
ग्रामपंचायतीकडून गावात सोडले जाणारे पाणी गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाण्यासाठी महिलांना दूरवर जावे लागत असल्याने एका भांड्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, पाणी आणताना पाय घसरून एका महिलेचा हात मोडल्याची घटना घडल्याने गावात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
महिला ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचल्या असता सरपंच व सचिव अनुपस्थित असल्याने त्यांचा संताप आणखी वाढला. पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू न केल्यास पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.
याबाबत ग्रामपंचायत सचिव अशोक बुरकुल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. तसेच गटविकास अधिकारी बांगर यांनी संबंधित सरपंच व सचिवांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे सांगितले. पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उन्हाळा अजून पूर्णपणे सुरूही झाला नसताना गावात निर्माण झालेली ही पाणीटंचाईची स्थिती गंभीर ठरत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.