बुलढाण्याच्या शेतकऱ्यांसाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधवांची धाव; वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत दुष्काळसदृश यादीत जिल्ह्याच्या समावेशासाठी ठाम मागणी! फडणवीसांची सकारात्मकता...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा प्रदीर्घ खंड पडून खरीप पिके संकटात सापडलेली असताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत जिल्ह्याचा दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे. १६ सप्टेंबर रोजी मुंबईतील वर्षा बंगल्यावर झालेल्या या भेटीमुळे बुलढाण्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पुन्हा शासनस्तरावर गांभीर्याने मांडणी मिळाली आहे.
प्रतापराव जाधव हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मात्र, या भेटीत केवळ औपचारिक चर्चा न करता त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली. जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला असून, बुलढाण्याचा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

बुलडाणा

 ADVT 👆🏻

सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम झाला आहे. पिकांच्या वाढीच्या आणि उत्पादनाच्या निर्णायक टप्प्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर उत्पादन घटण्याचे संकट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या साप्ताहिक पर्जन्यमान अहवालानुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी नोंदविण्यात आले.

अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी प्रतापराव जाधव यांनी शासनदरबारी पाठपुरावा केल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी मांडणे, ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्ह्याचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या निकषांनुसार तातडीने फेरआढावा घ्यावा, १८ जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करावा, खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान सर्वेक्षण व पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीची आर्थिक मदत व पीकनुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेदरम्यान सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आहे. त्यामुळे आता प्रतापराव जाधव यांच्या या पाठपुराव्यानंतर शासन बुलढाणा जिल्ह्याच्या मागणीबाबत काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.