बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध उद्धवसेना आक्रमक; ११ ऑगस्टला जनआक्राेश आंदोलन! पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदाेलनात सहभागी व्हावे; जालींदर बुधवत यांचे आवाहन..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामान्य नागरिकांचे प्रश्न जैसे थे असताना, महायुती सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्यांसह भ्रष्टाचाराचा कलंक गाठला आहे. अशा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही जनभावना असून, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने राज्यभर ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात येणार आहे. बुलढाण्यात हे आंदोलन ११ ऑगस्ट रोजी होणार असून, यात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि जिल्हा समन्वयक गजानन वाघ यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे नियोजन बैठक पार पडली. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बुधवत यांनी सांगितले की, एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढत आहे, पीककर्जाबाबत केवळ आश्वासने देऊन सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारमधील पक्षांनी विसरली आहेत.
पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहेत. ‘लाडकी बहिण’ योजनेतील लाभ कमी करून लाखो बहिणींना यातून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य करणारे कृषिमंत्री तसेच भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले अन्य मंत्री यांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे अशा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर ‘जनआक्रोश आंदोलन’ होणार आहे.
बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागृहाजवळ ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार असून, जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जालिंदर बुधवत आणि गजानन वाघ यांनी केले आहे.