पांढरदेवमध्ये बिबट्याची दहशत कायम! आठ दिवसांत दोन गायींची शिकार; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

 

 

पांढरदेव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पांढरदेव गावात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या आठ दिवसांत दोन गायींची शिकार झाल्याने गावकरी भयग्रस्त झाले असून, रात्र होताच लोक जीव मुठीत धरून राहत आहेत. आज, दि. ६ एप्रिल २०२५ रोजी, सकाळच्या सुमारास विश्वास काकफळे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केले.
विश्वास काकफळे हे मजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून, त्यांनी कष्टाच्या पैशातून गाय खरेदी केली होती. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना समजताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याआधी आठवडाभरापूर्वी देविदास म्हस्के यांच्या गायीवरही बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळी वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला होता आणि अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
गावकऱ्यांची मागणी आहे की, बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच, शेतात येणारी लाईट सध्या रात्री ११ वाजता सुरू होते, ती लाईट रात्री ९ वाजताच सुरू करावी, अशीही मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी असून, आता आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.