तांदुळवाडीच्या लेकीची गगनभरारी! नम्रता रिंढे पाटील यांचा ‘राजमाता जिजाऊ सन्मान’ पुरस्काराने गौरव! साहित्य, समाजकार्य आणि नारी शक्तीचा जागर करणाऱ्या तरुणीचा राष्ट्रीय स्तरावर झाला सन्मान.....

 
 सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याच्या निमित्ताने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे “जागर स्त्री शक्तीचा, गजर राष्ट्रभक्तीचा” या भव्य कार्यक्रमात राज्यभरातील कर्तृत्ववान ५१ महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तांदुळवाडी गावची लेक आणि युवा साहित्यिक कु. नम्रता रिंढे पाटील यांना ‘राजमाता जिजाऊ सन्मान’ प्रदान करण्यात आला.

परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आणि परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात लाखोंच्या जनसागरासमोर नम्रता यांचा गौरव ही एक अभिमानास्पद बाब ठरली.
नम्रता रिंढे पाटील यांचे योगदान केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही, तर त्यांनी सातपुड्यातील आदिवासी जीवनावर आधारित ‘मुलगी म्हणून जगताना’ आणि इतर पुस्तकांतून समाजाचे वास्तव मांडले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना साहित्य रत्न, नारी शक्ती पुरस्कार, तसेच राज्यस्तरीय विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
९७व्या आणि ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष जबाबदारी पार पाडणाऱ्या नम्रता यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ युवा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
तांदुळवाडी सारख्या छोट्या गावातून येत, राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडणाऱ्या नम्रता रिंढे पाटील यांचे कार्य ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.