साेयाबीन साेंगणी सुरू आगीच्या घटना वाढल्या; मातला, बेराळ्यात साेयाबीनच्या गंजीला लावली आग...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांचे साेयाबीन येताच आग लावण्याच्या घटना वाढल्या आहेत. बुलढाणा तालुक्यातील मातला आणि चिखली तालुक्यातील बेराळा येथील शेतकऱ्यांच्या साेयाबीन सुडीला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुभाष साहेबराव कुंजरगे  यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या पत्नी लता सुभाष कुंजरगे यांच्या नावावर मातला शिवारात गट क्रमांक २०८ मधील ८१ आर जमीन आहे. या जमिनीत त्यांनी सोयाबीन आणि तूर अशी पिके घेतली होती. काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे पीक कापून त्याची सुडी शेतात घातली होती. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता ते शेतातून घरी आले असता सर्व काही व्यवस्थित होते. मात्र, त्याच रात्री सुमारे साडेनऊ वाजता त्यांच्या चुलत भावाला, अमोल शंकरराव कुंजरगे याला सागर राजू कड यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या शेताकडे मोठा जाळ दिसत आहे. ही माहिती मिळताच सुभाष कुंजरगे, पंजाबराव कुंजरगे, शंकरराव नामदेव कुंजरगे, देशराव सुखदेव सरोदे, भगवान उत्तम सरोदे तसेच सागर राजू कड आणि गणेश चौहान यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

तेथेपोहोचल्यावर त्यांच्या शेतातील अंदाजे दोन एकर क्षेत्रातील सोयाबीनची सुडी पेटलेली आढळली. घटनास्थळी कोणीही दिसून आले नाही. या आगीमध्ये सुमारे १७ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले असून, अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. 

बेराळा येथील ६५ वर्षीय जिजाबाई भक्तराज इंगळे यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली. त्या त्यांच्या भावाची शेती पाहत आहेत. या शेतातील साेयाबीनची साेंगणी करून सुडी लावली हाेती. या सुडीला त्यांचा भाचा प्रेम समाधान सुरडकर (रा. चिखली)व अन्य एकाने साेयाबीन सुडीला आग लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.