ज्वारीचं उत्पादन घटलं, दर नाहीत... शेतकरी हवालदिल! संग्रामपूरात रात्रीच्या अंधारातही काढणी सुरू! वानखेडचे शेतकरी म्हणतात, म्हणून शेती विकावीशी वाटते....

 
 संग्रामपूर(स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यात सध्या ज्वारीच्या काढणीला वेग आला असतानाही शेतकऱ्यांचे चेहरे मात्र चिंतेने म्लान झाले आहेत. रखरखत्या उन्हात राबत असतानाही अवकाळी पावसाच्या अभावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारात समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

परिसरात मजुरांची टंचाई जाणवत असल्याने काही ठिकाणी दिवसा-रात्री शेतकरी स्वतःच काढणीच्या कामात गुंतलेले दिसतात. मात्र, एका एकरातील ज्वारी काढणीतच ७ ते ८ हजार रुपयांचा खर्च येत असून, एकूण पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंतचा खर्च जवळपास २५ हजार रुपये होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्त दराची अपेक्षा असते, पण प्रत्यक्षात बाजारभाव मात्र समाधानकारक नाही.
शेती टिकवायची कशी?
"शेतीच्या जीवावर कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. कांद्यानंतर आता ज्वारीलाही भाव मिळत नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागवणं अवघड होत आहे," अशी भावना गोपाल भोपळे (शेतकरी, वानखेड) यांनी व्यक्त केली.
तर, नरेंद्र देशमुख (शेतकरी, वानखेड) म्हणतात, "शेती विकून बँकेत पैसे ठेवले, तरी त्या पैशावर मिळणारे व्याज हे सध्याच्या शेतीच्या उत्पन्नापेक्षा जास्त मिळू शकते. त्यामुळे अनेकदा शेती विकावी, असं वाटतं."
सध्याच्या परिस्थितीने शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून योग्य हस्तक्षेप आणि किमान हमीभावाची हमी मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.