धक्कादायक! अंचरवाडीचे शेतकरी उचलणार टोकाचे पाऊल! नेत्यांचे अन् जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शब्द हवेत विरले! शासन झाले गरीब, पुलासाठी निधीच नाही म्हणते..

 सामूहिक आत्महत्येची श्रृंखला सुरू होणार! ६० दिवसांत ६० शेतकरी संपवणार जीवन?
 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे.. हा प्रश्नच तेवढा गंभीर आहे. मात्र याचे गांभीर्य ना लोकप्रतिनिधींना आहे ना जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना..पावसाळ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे अंचरवाडी भरोसा रस्त्यावरील सावित्री नदीत पाणी वाढते, आठ _आठ दहा दहा दिवस शेतकऱ्यांना शेतात जाताच येत नाही..जनावरे उपाशी, दूध काढायला जायची सोय नाही..शेतात फवारणीसाठी,मशागतीसाठी जाता येत नाही,त्यामुळे शेकडो एकर शेतीची नापिकी..कधीकधी तर महिनाभर शेतीचा आणि काळया आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा संपर्क तुटतो... पण शेतकऱ्यांनी टाहो फोडायचा कुणाच्या दारात? सुस्त झोपलेल्या यंत्रणेला जागे कोण करणार? करू करू म्हणता म्हणता आता पावसाला अवघे चार महिने राहिलाय..याआधी पावसाळ्यात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले होते, मात्र केंद्रीय मंत्री ना.जाधव आणि आमदार मनोज कायंदे यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले. १ जून २०२६ च्या आधी पुलाचे काम पूर्ण होईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने नेत्यांच्या मध्यस्थीने दिले..मात्र झालं काय? अजून काहीच नाही..त्यामुळे आता पारची लढाई लढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय.."आमचा विषय मार्गी लावा नाहीतर आत्महत्येची सामूहिक श्रूखंला करू..रोज एक एक शेतकरी आपले जीवन संपवेल.. पावसाळ्यात तसेही रोज तिळ तिळ मरण्यापेक्षा एकदाच आम्ही संपवून  घेऊ" असे बोलतं शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय जाहीर केलाय..आतापर्यंत निवेदने दिली, अधिकाऱ्यांना भेटलो पण आता निवेदन न देताच हा निर्णय घेत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले..

 पावसाळ्यात अंचरवाडी ग्रामस्थांनी पुलासाठी केलेले जलसमाधी आंदोलन जिल्हाभर गाजले होते. मात्र धो धो कोसळणाऱ्या पावसात पहाटेच आ. मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनीदेखील फोनवरून अधिकाऱ्यांशी बोलून गावकऱ्यांना जलसमाधी आंदोलन स्थगित करायची विनंती केली होती. यावेळी १ जून २०२६ च्या आधी म्हणजे पावसाळा सुरु होण्याआधी पुलाचे काम मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन संबंधित विभागाच्या वतीने देण्यात आले होते. या आंदोनानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली मात्र या कामावर चर्चा झाली नाही.

त्यानंतर वेळोवेळी स्मरण देऊनही अद्याप पुलाचे काम सुरु झालेले नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरते.एकदा कशीबशी पेरणी आटोपल्यानंतर पुन्हा शेतात जाता येईलच याचा नेम नसतो. गेल्या वर्षी तर तब्बल आठ दिवस नदीच्या पलिकडे शेतात असणाऱ्या गोठ्यातील गुरांचा चारापाणी झाला नव्हता,काही शेतकऱ्यांची गुरे आजारी पडून मेली होती. वेळेवर फवारणी व इतर कामे न झाल्याने शेतीतून निम्मे उत्पन्नही निघाले नव्हते. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांच्या नशिबी हेच असल्याने आता किती दिवस सहन करायच? शासन आमची दखल घेतच नसेल तर जगून काय फायदा? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत..

उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक..

दरम्यान उद्या १० फेब्रुवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. दोन्ही पालकमंत्री जिल्ह्यात या निमित्ताने येणार आहेत. उद्याच्या बैठकीत या पुल प्रश्नावर सकारात्मक मार्ग निघण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. 


शेतकरी म्हणतात..

 "आतापर्यंत अनेकदा निवेदने दिली, अधिकाऱ्यांना भेटलो..आंदोलन केले पण पुल प्रश्न मार्गी लागला नाही. आता आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्येची सामूहिक श्रूखंला करण्याचा निर्णय घेतला आहे.पुढच्या १० दिवसांत म्हणजेच २० फेब्रुवारी पर्यंत यासंदर्भात सकारात्मक मार्ग न निघल्यास दररोज १ याप्रमाणे पुढचे ६० दिवस  ६० शेतकरी आत्महत्या करतील असा निर्णय आमच्या बैठकीत झाला आहे..कुणी गळफास घेईल, कुणी धरणात उडी घेईल, कुणी पेट्रोल ओतून पेटवून घेईल– विजय परिहार, शेतकरी