बेधडक आमदार गायकवाड! म्हणाले, लाडक्या बहिणींमुळे राज्य आर्थिक संकटात! ठाकरे बंधूंच्या युतीवर म्हणाले "खूप उशीर झालाय, उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. आज,७ जूनला एका कार्यक्रमाच्या वेळी आ. गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, यावेळी लाडक्या बहिणींमुळे राज्य आर्थिक संकटात असल्याचे विधान त्यांनी केले. याशिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबतही त्यांनी विधान केले...

राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर आमदार संजय गायकवाड यांनी ठाम प्रतिक्रिया व्यक्त केली. "या दोन्ही बंधूंनी जर दहा-पंधरा वर्षांपूर्वी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असता, तर आज महाराष्ट्राचे राजकीय चित्र पूर्णपणे वेगळे असते,"
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपासून दूर जाऊन जे आघाडीचे राजकारण केले आहे, त्यामुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे. त्यामुळे राज-उद्धव यांची युती झाली, तरी त्याचा फायदा होणार नाही." असे आ.गायकवाड म्हणाले.
राजकीय चर्चेव्यतिरिक्त राज्यातील आर्थिक परिस्थितीवरही आमदार गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "लाडक्या बहिणींमुळे राज्य आर्थिक संकटात सापडले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. राज्यावर सव्वा लाख कोटी रुपयांची तूट आहे. याचा थेट परिणाम विकासकामांवर, कर्मचाऱ्यांच्या पगारांवर आणि अन्य अनेक बाबींवर झालेला आहे," असे ते म्हणाले.
तसेच मागील अधिवेशनात कोणत्याही आमदाराला बजेटचे पैसे मिळाले नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला. "कुठल्याही खात्याचे निधी वाटप झालेले नाही. बहिणींना सांभाळायचे असल्याने अनेक आमदार गप्प बसले आहेत. हे वर्ष जरी संकटाचे असले, तरी येत्या जुलै-ऑगस्टपर्यंत तूट भरून निघेल आणि पुढच्या बजेटमध्ये परिस्थिती समाधानकारक होईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.