स्व. कैलास नागरे यांच्या आत्महत्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्यांची मागणी पूर्ण करणे शक्य नव्हते"! पाण्याचा प्रश्न केव्हा सुटेल? तेही सांगितलं...

 
 मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या आधी कैलास नागरे यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी शेतीसाठी पाण्याची मागणी केली होती. खडकपूर्णा धरणातून शिवणी आरमाळ सह आजुबाजूच्या ४ पाझर तलावात पाणी सोडावे अशी स्व. कैलास नागरे यांची मागणी होती. या मागणीसाठी कैलास नागरे यांनी आमरण अन्नत्याग आंदोलन देखील केले होते. दरम्यान स्व. कैलास नागरे यांच्या आत्महत्येचा मुद्दा विरोधकांनी लावून धरल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर भाष्य केले आहे. काल,२५ मार्चला अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व.कैलास नागरे यांची आत्महत्या दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कैलास नागरे यांच्या आत्महत्येची पार्श्वभूमी देखील सभागृहात सांगितली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संत चोखामेळा सागर प्रकल्पातून सोडले जाणारे पाणी जलसंधारण विभागातील शिवणी अरमाळ येथील लघु प्रकल्पात डाव्या कालव्याद्वारे सोडावे अशी त्यांची मागणी होती. या ठिकाणी उपलब्ध असणारा जलसाठादेखील तुटीचा आहे, १९ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळेल या अपेक्षेसह या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. परंतु पाणलोट क्षेत्रातील १९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ७ हजार हेक्टर क्षेत्रालाच सिंचन मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुळात कैलास नागरे मागणी करत असलेली जागा पाणलोट क्षेत्रापासून ८ किमी दूर असल्या कारणाने त्यांची मागणी पूर्ण करणे शक्य नव्हते. या संदर्भात पूर्वी देखील त्यांनी ३ वेळा आंदोलन केले होते. वेळोवेळी त्यांच्या समस्यांचं समाधान करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणलोट क्षेत्रातच पाण्याची कमतरता असून ८ किमी दूर पाणी पोहोचवणे शक्य नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच नळगंगा-वैनगंगा प्रकल्पातून जे अधिकचे पाणी उपलब्ध होणार ते आपल्या भागात नक्कीच येईल, असे आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आले आणि त्यांनी ते मान्य देखील केले होते. परंतु दुर्दैवाने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्व .कैलास नागरे यांच्या आवाहनाप्रमाणे नळगंगा-वैनगंगा प्रकल्पासह इतर पर्यायी मार्गाने या भागातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच त्यांच्या जमिनीसंदर्भातील न्यायालयात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठीदेखील सरकार मदत करेल, त्यासोबतच त्यांच्या अपत्यांना दत्तक घेत त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून देखील सरकार पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले...