संत गजानन महाराजांची पालखी मेहकरमध्ये दाखल होणार; वाहतुकीत मोठे बदल १४ ऑगस्ट रोजी पालखीचे आगमन; १५ ऑगस्ट सकाळपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश

 
मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनिल मंजुळकर: दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघाली आहे. या पालखीचे ११ ऑगस्ट २०२६ रोजी सिंदखेडराजा मार्गे बुलढाणा जिल्ह्यात आगमन होणार असून, १४ ऑगस्ट रोजी लोणार येथून सुलतानपूरमार्गे मेहकर येथे पालखीचा रात्री मुक्काम होणार आहे.

 

पालखीच्या दर्शनासाठी मेहकर शहरासह परिसरातील गावांमधून हजारो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालखी मार्गावर मोठी गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच भाविकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे सुनियमन राखण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या आदेशानुसार मेहकर शहरातील पालखी मार्गावरील वाहतूक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

कोणती वाहतूक कुठून वळविणार?

१. सिंदखेडराजाकडून मेहकरकडे येणारी वाहतूक :

सुलतानपूर मार्गे मेहकरकडे येणारी वाहतूक सिंदखेडराजा – देऊळगाव राजा – चिखली – अमडापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.

२. चिखली–लव्हाळा मार्गे मेहकरकडे येणारी वाहतूक :

ही वाहतूक चिखली – लव्हाळा – अमडापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.

३. वाशिम, मालेगाव, डोणगावकडून सुलतानपूरकडे जाणारी वाहतूक :

ही वाहतूक खंडाळा बायपास – सोनाटी बायपास – लोणार फाटा – चिखली या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

४. जानेफळकडून मेहकरकडे येणारी वाहतूक :

ही वाहतूक जानेफळ रोड – डोणगाव रोड – डीपी रोड – बस स्टँड, मेहकर या मार्गाने वळविण्यात येणार आहे.

भाविकांनी आणि वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पालखी मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वाहतूक बदलाचा कालावधी :

📅 १४ ऑगस्ट २०२६, सकाळी ६ वाजता ते

📅 १५ ऑगस्ट २०२६, सकाळी १० वाजेपर्यंत

पालखी सोहळा सुरळीत पार पडावा आणि भाविकांना श्रींचे दर्शन सुरक्षितपणे घेता यावे, यासाठी नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार, पोलीस स्टेशन मेहकर यांनी केले आहे.