काँग्रेसमध्ये "संजीवनी"! संदीप शेळके यांच्या जिल्हा संवाद दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद! पक्षासोबत ठामपणे राहण्याचा काँग्रेसजणांचा निर्धार...! संदीप शेळके म्हणाले, विचारांचा वारसा जपण्यासाठी लढाई...
Mar 28, 2026, 18:24 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हा देश, शिव, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे. या विचारांवर जगणाऱ्या लोकांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र आता हा देश मनुस्मृतीवर चालावा अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. संविधान मोडीत काढण्याचा कुटिल डाव सध्या देशात रचल्या जात आहे.. मात्र हा डाव यशस्वी होणार नाही.. कारण विचारांची लढाई लढणाऱ्या काँग्रेस पक्षाची पाळे मुळे देशातल्या गावागावात रुजली आहेत असे प्रतिपादन काँग्रेस नेते संदीप शेळके यांनी केले आहे. संदीप शेळके यांचा दोन दिवसीय जिल्हा संवाद नुकताच पार पडला. या दौऱ्यात त्यांनी तेराही तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांच्या भेटी घेत संवाद साधला..यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसजणांनी पक्षाच्या विचारांसोबत राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. तसेच संघटना बांधणीबाबत तळमळ व्यक्त केली.
पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांच्या 'संघटन सृजन' संकल्पनेतून ज्येष्ठ आणि युवा यांच्या एकत्र मोट बांधणीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी पक्षीय स्तरावर प्राधान्य देण्यात येत आहे. याच धर्तीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस नेते संदीप शेळके यांनी जिल्हा संवाद दौरा केला. दोन दिवसात १३ तालुक्यांतील काँग्रेसजणांच्या गाठीभेटी घेतल्या. दौऱ्याची सुरुवात घाटाखालील मोताळा, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव, शेगाव तालुक्यांपासून करण्यात आली. त्यानंतर घाटावरील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा अशा तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या. आजी, माजी नगराध्यक्ष, माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे उस्फुर्त स्वागत केले.
शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी काँग्रेसमध्ये: संदीप शेळके..
आजोबा दिवंगत स्वातंत्र्यसेनानी उत्तमराव पाटील यांच्यामुळे काँग्रेस पक्षासोबत आपली नाळ जुळलेली आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी काँग्रेसमध्ये आलो आहे. पक्षाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनांनुसार पक्षातील ज्येष्ठ, अनुभवी तसेच युवा कार्यकर्ते यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक पुढाकार घ्यायचा आहे, अशी भूमिका संदीप शेळके यांनी मांडली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व प्रेरणादायी...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांवर मार्गक्रमण करीत त्यांनी पक्षाचा विचार मनामनांत रुजवला. अत्यंत कमी वयात जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक पदे भूषवून जबाबदारीला न्याय दिला. जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करीत असतांना हर्षवर्धन सपकाळ यांचे पाठबळ नवी ऊर्जा देणारे आहे. त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे, असेही संदीप शेळके यांनी सांगितले.