बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर, जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश...
बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर आणि जळगांव जामोद या तालुक्यामध्ये 1 जुनच्या सांयकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, सावळा, अकोली, चांगेफळ, निवाना, रुधाना, वकाना, पळशी झाशी, बावनबीर, टुनकी, काकनवाडा, वरवंड यासह अन्य गावामध्ये शेतातील केळीचे नुकसान झाले आहे. संग्रामपूर तालुक्यात सुमारे 600 हेक्टर शेतजमीनीवरील केळी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
केळी बागायतदार शेतकऱ्यांचे या वादळी पावसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जळगांव जामोद तालुक्यातही या वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून सुमारे 450 हेक्टर शेतजमीनीवरील केळींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी संत्रा पिकांचेही नुकसान झाले आहेत तर अनेक शेतकऱ्यांचे घरावरचे व गोठयावरचे टिनपत्रे उडून गेल्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुंटूब कल्याण राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांना दिले आहेत.