संभाजी ब्रिगेडचे कृषी अधिकारी कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन; म्हणाले निवडणुक काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा..!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून देत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली. निवडणुकीच्या काळात दिलेले शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करत सरकारचे लक्ष वेधले.
त्याचबरोबर, बुलडाणा जिल्ह्यातील "येलो मोज्या" प्रकरणामुळे रिजेक्ट करण्यात आलेले शेतकऱ्यांचे पीक विमा तात्काळ जमा करावा, एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच रखडलेले फळबाग, तुषार सिंचन, ठिबक, विहीर व गोट्याचे अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे, अशा मागण्याही आंदोलनात मांडण्यात आल्या.
संभाजी ब्रिगेडच्या या शांततापूर्ण पण ठाम आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून प्रशासन आणि सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली