नामस्मरण आणि अन्नदान अट्टाहासाने करा - श्रीहरी महाराजांचा उपदेश! बुलढाण्यातील नामजप शिबिर उत्साहात; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संतांनी अनुभवातून आपल्याला जगण्याचा मार्ग सांगितला आहे. संतांचे आपल्यावर थोर उपकार आहेत. मात्र संतांनी सांगितलेला सोपा असा नामस्मरणाचा मार्ग आपण सोडून अनेक थोतांड्यांना बळी पडतो. कलियुगात तरुण जाण्यासाठी नामस्मरण आणि अन्नदान अट्टाहासहाने करा. नित्यनेमाने राम नाम घ्या असे मौलिक मार्गदर्शन समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज (श्रीक्षेत्र माकोडी) यांनी बुलढाण्यात केले. 

रामनामाचा प्रसार आणि प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्री. श्रीहरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बुलढाणेकर भाविकांनी तीन दिवसीय नामजप शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सांगता प्रसंगी मुख्य मार्गदर्शनात ते बोलत होते. प.पू. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान विघ्नहर्ता गणेश मंदिर पाळणाघराजवळ रामनगर बुलढाणा येथे हे शिबिर पार पडले. यावेळी श्रीहरी महाराज म्हणाले, "जैसे खावे अन्न तसे होते मन", त्यामुळे ज्या आहारातून सात्विकता अंगी येईल असा आहार घ्यावा. सद्गुरूंचे व्यासपीठ हे मोठ आहे. नाम आणि देव वेगळे नाहीत. जिथे नाम आहे तिथे देव नक्की आहे. आपण निर्भयतेने नाम घेतलं तर सद्गुरु आपल्याला शोधत येतील. प्रपंचामध्ये आज अनेक अडचणी आहेत. संस्कृती सुटत चालल्यामुळे घराघरात अनेक समस्या उद्भवत आहेत. दुराचारी यांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे ज्याच्या घरात संस्कृती टिकेल, त्याचा प्रपंच नेटका होईल. मुला बाळांवर संस्काराचे बीजारोपन करा. नामस्मरणाचा मार्ग सोडू नका. सद्गुरु प्रल्हाद महाराजांची दासत्व सेवा आपली सुरू आहे. तुम्ही देखील मनाशी ठरवा.पक्का निग्रह करा.भगवंत दयाळू आहे ,तो नक्कीच कृपा करील. संत, सद्गुरु भगवंताची गाठ घालून देतात. मात्र त्यासाठी त्यांनी सांगितलेला नामस्मरणाचा मार्ग आपल्याला प्राणपणाने जपायला हवा असेही श्रीहरी महाराज म्हणाले.

   ७ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता काकडा आरतीने या सोहळ्याला सुरुवात झाली. दिवसभर नामस्मरण आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर रात्री सौ. राजश्री देशपांडे (चिखली )यांचे प्रवचन झाले. ८ फेब्रुवारीला दुपारी श्री सुयोग गुरुदेव भजनी मंडळ ( बुलढाणा) यांच्या भजन सेवेमध्ये भाविकांचे कान तृप्त झाले. सायंकाळी डॉ. कल्याणीताई पद्मने (अकोला) यांचे सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. ९ फेब्रुवारीला सकाळी पाच वाजता सौ सुनंदा राऊत काकू ( बुलढाणा) यांनी प.पु . ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर जन्मोत्सवाचे प्रवचन केले. यानंतर फटाके फोडून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी दहा चे सुमारास हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज (निरपूरकर) यांनी काल्याचे किर्तन केले. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.