रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली! शुगर ५० पेक्षा कमी;...तर "हायपोग्लायसेमिया" होऊ शकतो!वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय!किडनीवरही झाला परिणाम!

 रविकांत तुपकर मात्र माघार घ्यायला तयार नाही; म्हणाले,जीव गेला तरी चालेल...
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी (१७ जून) त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे.रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खूप कमी झाल्याने तुपकर यांना कोणत्याही क्षणी "हायपोग्लायसेमिया" होऊ शकतो असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या तुपकर यांना अशक्तपणा,अंधाऱ्या येणे,उभे न राहता येणे यासह तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे आहेत. तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे असा वैद्यकीय तज्ञांचा अभिप्राय असला तरी रविकांत तुपकर मात्र अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आदी मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. जीव गेला तरी चालेल पण आता माघार नाही म्हणजे नाही असेही रविकांत तुपकर यांनी स्पष्ट सांगितले..

आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास डॉक्टरांनी रविकांत तुपकर यांची तपासणी केली. रक्ताच्या तपासणीत साखरेची पातळी ५० पेक्षा कमी झाल्याचा रिपोर्ट आहे. पुढील काही तास रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहिल्यास ही पातळी ४० पेक्षा कमी होऊन "हायपोग्लायसेमिया" होऊ शकतो असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे शरीराच्या कार्यात अडथळा येणे, अशक्तपणा,शरीर थरथरणे,थंडी ,चक्कर येणे यासह व्यक्ती कोमात जाऊ शकतो असेही वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे.दरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास देखील वैद्यकीय पथकाने रविकांत तुपकर यांची तपासणी केली असून प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

आंदोलनाची दखल नाही, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप..

रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी देखील मागण्यांवर ठोस निर्णय होऊ शकला नाही. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,कृषी अधिकारी आदींनी आंदोलनस्थळी जाऊन तुपकरांशी चर्चा केली असली तरी तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे सरकार शेतकरी आंदोलनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून खामगावातील "एसडीओ" कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, जळगाव जामोद मध्ये तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून केलेले आंदोलन हे त्याचेच द्योतक आहे.