शक्तीपीठ महामार्गावरून रविकांत तूपकरांचा सरकारवर हल्लाबोल! म्हणाले,शेतकऱ्यांच्या जमिनी धोक्यात; विश्वासात न घेता निर्णय...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी धोक्यात आल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तूपकर यांनी दिली आहे. हा केवळ भूसंपादनाचा मुद्दा नसून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनमानावर होणारे आक्रमण असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता, ही प्रक्रिया पारदर्शक नाही असाही हल्लाबोल रविकांत तुपकर यांनी चढवला आहे.

तूपकर म्हणाले की, कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांचा सल्ला, सहमती आणि सहभाग आवश्यक असतो. मात्र या प्रकल्पात शेतकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. अनेक शेतकरी त्यांच्या जमिनी गमावणार आहेत. शेती आणि उपजीविकेचे साधन हातातून जाणार आहे. हे अन्यायकारक विस्थापन असून सरकारने याची दखल घ्यावी.
महामार्गाच्या नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेत पारदर्शकता नाही. विकास हवा, पण तो शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा नसावा. स्थानिक जनतेचा आवाज दडपून चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सरकारने तत्काळ हा प्रकल्प थांबवावा आणि थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. अन्यथा शेतकरी आणि सरकारमधील संघर्ष तीव्र होईल, आणि त्याची जबाबदारी शासनावर राहील असेही तुपकर म्हणाले..