बच्चू कडूंच्या समर्थनार्थ उद्या बुलडाणा जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन! शेतकरी-दिव्यांगांच्या वेदनांचा उद्रेक; प्रहारचे वैभवराजे मोहितेंचे आवाहन
Jun 13, 2025, 14:49 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपयांचे मानधन मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी (अमरावती) येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यांच्या या निर्भीड आणि आक्रोशपूर्ण संघर्षाकडे सरकारकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेलेली नाही, याचा तीव्र निषेध व्यक्त करत उद्या, १५ जून रोजी बुलडाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हा समन्वयक वैभवराजे मोहिते यांनी दिली.
राज्यभरातून बच्चू कडूंच्या या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, "दळभद्री" आणि जनतेच्या वेदनांबाबत ठामपणे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने अद्याप कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नसल्याने आता प्रहार जनशक्तीने आंदोलनाचा आवाज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व इतर सामाजिक घटकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करताना वैभवराजे मोहिते म्हणाले, "हा लढा केवळ बच्चू कडूंचा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. अन्नदाता शेतकरी आणि संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या दिव्यांगांच्या वेदना आपण दुर्लक्षित करू शकत नाही. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावेच लागेल."
"शेतकऱ्यांच्या जीवनातला अंधार दूर करायचा असेल, दिव्यांगांच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश पेरायचा असेल, तर बच्चू कडूंचे बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी. प्रशासनानेही या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.