सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर; येवती ग्रामपंचायतीत नेतृत्व बदलाची शक्यता

 
 लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)– येवती ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या घटनाक्रमात सरपंच प्रयागबाई अर्जुन पाटोळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. २० जून रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत ९ पैकी ८ सदस्यांनी ठरावाला पाठिंबा दिल्यामुळे ग्रामपंचायतीत नेतृत्व बदलाची शक्यता प्रबळ झाली आहे.

सदस्यांनी ठरावात सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्यावर स्वेच्छेने निर्णय घेणे, पारदर्शकतेचा अभाव, योजनांची प्रभावी अंमलबजावणी न करणे, निधी वाटपात अनियमितता आणि मासिक ग्रामसभा न घेण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत. या ठरावावर उपसरपंच रामेश्वर कायंदे, सदस्य अनिता वाघ, रामेश्वर सानप, मंदाबाई सानप, नारायण कायंदे, प्रिया खरात, लता खरात आणि रेणुका डोईफोडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
ग्रामपंचायतीतील ९ पैकी ८ सदस्यांचा ठरावाला पाठिंबा असल्याने सरपंच पाटोळे यांचे पद धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, सरपंच थेट जनतेतून निवडून आले असल्याने अंतिम निर्णय जिल्हाधिकारी बुलढाणा घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. या प्रकरणाच्या पुढील टप्प्यात सरपंचांनी जनतेसमोर विश्वासमत सादर करावे लागणार असून, त्यानंतरच त्यांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
या नाट्यमय घडामोडींमुळे येवती ग्रामपंचायतीत राजकीय हालचालींना वेग आला असून गावात तसेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नेतृत्व बदल होणार की प्रयागबाई पुन्हा विश्वास संपादन करतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.