निवडणुकीत पारदर्शकता राखा; अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप थांबवावा – ॲड. जयश्री शेळके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ):स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा नगर परिषद हद्दीत होणाऱ्या क्षेत्ररचनेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये, तसेच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या निकोप पद्धतीने पार पडावी, अशी ठाम मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनाद्वारे ॲड. जयश्री शेळके यांनी स्पष्टपणे नमूद केले की, "लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी निवडणुका केवळ प्रक्रिया नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासन व निवडणूक यंत्रणेकडून कोणत्याही राजकीय पक्षाचा झुकाव न ठेवता, ही संपूर्ण प्रक्रिया निःपक्ष आणि विश्वासार्ह असावी, हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे."
बुलडाणा जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे क्षेत्ररचनेची तयारी सुरू झाली असून, ही रचना केवळ राजकीय सोयीसाठी न करता जनगणना, भौगोलिक सुसंगती आणि स्थानिक भागांचे वास्तव ध्यानात घेऊन केली जावी, असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, "बुलडाणा नगर परिषद हद्दीत काही अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर संशय निर्माण करणारे असून, अशा प्रकरणांची चौकशी करून आवश्यक असल्यास तत्काळ कारवाई करण्यात यावी."
या शिष्टमंडळात महाविकास आघाडीचे नेते, माजी आमदार, स्थानिक पदाधिकारी आणि विविध पक्षांचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आ. सिद्धार्थभाऊ खरात, माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसेनजित पाटील, डॉ. ज्योती खेडेकर, वसंतराव भोजने, प्रकाशराव पाटील, अशिष रहाटे, नरेश शेळके, नंदू कराडे, नफीजभाई, अतुल लोखंडे, दत्ता पाटील, गजानन वाघ, अतुलदादा पाटील, दत्ताभाऊ काकस, विनोदभाऊ बेंडवाल आदींचा समावेश होता.
महाविकास आघाडीने प्रशासनाकडे ठाम इशारा दिला की, भविष्यात जर निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा पक्षपात किंवा हस्तक्षेप आढळून आला, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल.